Search This Blog

Wednesday, August 31, 2016

आणखी 57 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

अपूर्ण कागदपत्रांमुळे आणखी 57 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
नोंदणी रद्द झालेल्या पक्षांची संख्या आता 248 पर्यंत
                                                                  -राज्य निवडणूक आयुक्त
       मुंबई, दि. 31: नोटिस बजावूनही विवरणपत्र्यांच्या व लेखा परीक्षित लेख्याच्या संपूर्ण प्रती सादर न केल्यामुळे आणखी 57 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची राज्‍य निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांची एकूण संख्या आता 248 झाली आहे, अशी माहिती राज्य‍ निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
            श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 365 राजकीय पक्षांची नोंदणी झाली होती. त्यात 17 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश आहे. आयकर विवरणपत्र व लेखापरीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण 326 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटिस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी 78 पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली; परंतु 248 पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. 248 ही संख्या आता नव्याने नोंदणी रद्द करण्यात आलेल्या 57 पक्षांसह आहे. नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांना मुक्त चिन्ह वाटपात प्राधान्य मिळणार नाही.
राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेल्या 365 पैकी आता नोंदणी कायम असलेले केवळ 117 राजकीय पक्ष आहेत. त्यात 17 मान्यताप्राप्त; तर 100 अमान्यताप्राप्त पक्षांचा समावेश आहे. मान्यताप्राप्त 17 पैकी नऊ राजकीय पक्षांनी सर्व कागदपत्रे सादर केली आहेत; परंतु कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या आठ मान्यताप्राप्त पक्षांनाही नोटिस नुकत्याच बजावण्यात आल्या आहेत, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
 नोंदणी रद्द करण्यात आलेल्या 57 राजकीय (कार्यालयाच्या पत्त्यानुसार जिल्हानिहाय) पक्षांची नावे अशी: मुंबई- 1) हिंदू राष्ट्र सेना, 2) राष्ट्रहित पार्टी, 3) युनायटेड सेक्युलर काँग्रेस पार्टी, 4) विकास कार्य सन्मान पार्टी, 5) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, 6) भारतीय शेतकरी कामगार पक्ष, 7) भारतीय प्रजासत्ताक पक्ष, 8) क्रांतिकारी जयहिंद सेना, 9) डेमोक्रॅटिक पार्टी (डी.पी.), 10) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (R.K.), 11) महाराष्ट्र परिवर्तन सेना (म.प.से.), 12) संविधान सुरक्षा पार्टी, 13) स्वराज सेना, ठाणे/पालघर- 1) लोकहितवादी लीडर पार्टी, 2) नॅशनल लोकहिंद पार्टी (गरीब नवाज), 3) हिंदुस्थान प्रजा पक्ष, नाशिक- 1) हिन्दू एकता आंदोलन पार्टी, 2) स्वतंत्र भारत पक्ष, 3) भारतीय बहुजन सेना, धुळे- 1) शहर विकास आघाडी, दोंडाईचा, 2) मानव एकता पार्टी, जळगांव- 1) जळगाव शहर विकास आघाडी, जळगाव, 2) महाराष्ट्र ईस्ट खान्देश एकता नगरविकास आघाडी, 3) चाळीसगाव शहर परिवर्तन आघाडी, चाळीसगाव, अहमदनगर- 1) महानगर विकास आघाडी, 2)  अहमदनगर बहुजन क्रांती सेना, पुणे- 1) लोणावळा शहर विकास आघाडी, 2) भारतीय लोकसेवा पार्टी, 3) जनमत विकास आघाडी, सासवड, 4) नेताजी काँग्रेस सेना, 5) नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी, दौंड, 6) लोकशाही क्रांती आघाडी, 7) रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, 8) हिंदुस्थान जनता पार्टीसोलापूर- 1) लोकराजा शाहू विचार आघाडी, 2) मंगळवेढा शहर विकास आघाडी, 3) पंढरपूर लोकशाही आघाडी, पंढरपूर, सातारा- 1) नगर विकास आघाडी, म्हसवड, 2) राजेमाने पार्टी, कोल्हापूर- 1) ब्लॅक पॅन्थर, 2) पेठ वडगाव विकास आघाडी, औरंगाबाद- 1) लोकविकास पार्टी,  2) भारतीय आसरा लोकमंच, नांदेड- 1) महिला मानव विकास आघाडी, जालना- 1) नगर विकास आघाडी, परतूर, लातूर- 1) अखिल भारतीय सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना पार्टी, 2) मातंग मुक्ती सेना, अमरावती- 1) प्रहार पक्ष, 2) जनविकास कॉग्रेस, 3) अमरावती जनकल्याण आघाडी, यवतमाळ- 1) नगर विकास आघाडी, दारव्हा, 2) परिवर्तन विकास आघाडी, बुलडाणा- 1) मलकापूर शहर सुधार आघाडी, 2) नांदुरा नवनिर्माण आघाडी, चंद्रपूर- 1) रिपब्लिकन आंदोलन, नागपूर- 1) पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि दिल्ली- 1) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- एकतावादी.