Search This Blog

Tuesday, July 26, 2022

महानगरपालिकांच्या आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत

मुंबई, दि. 26 (रानिआ): औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्या आरक्षित जागांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी सोडत काढली जाईल. त्यानंतर 6 ऑगस्ट 2022 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर 6 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 20 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

Monday, July 25, 2022

9 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांची 13 ऑगस्टला प्रसिद्धी

 विविध 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 
प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची 13 ऑगस्टला प्रसिद्धी

मुंबई, दि. 25 (रानिआ): औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 22 ऑगस्ट 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रारुपाच्या स्वरुपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 22 ऑगस्ट 2022 पर्यंत संबंधित ठिकाणी हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 2 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

  प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.


Thursday, July 14, 2022

निवडणुका स्थगित

 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई, दि. 14 (रानिआ): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज येथे केली.   

राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी या निवडणुकांची घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात 12 जुलै 2022 रोजी सुनावणी झाली. समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासवर्गाबाबत दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला; तसेच 19 जुलै 2022 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.