Search This Blog

Wednesday, August 24, 2016

127 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 77 टक्के मतदान

विविध 20 जिल्ह्यांतील 127 ग्रामपंचायतींसाठी
प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 77 टक्के मतदान
मुंबई, दि. 24: विविध 20 जिल्ह्यांमधील 127 ग्रामपंचायतींच्या (एकूण 816 जागा) सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 77 टक्के मतदान झाले. सर्व ठिकाणी शुक्रवारी (ता. 26) मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 21 जुलै 2016 रोजी 23 जिल्ह्यांमधील 169 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला होता. या सर्व ग्रामपंचायती मिळून एकूण 1 हजार 363 जागा होत्या. त्यातील 20 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या. इतर विविध ग्रामपंचायतींमधील 463 जागांच्या निवडणुकाही बिनविरोध झाल्या.  त्याचबरोबर एकूण जागांपैकी काही जागा बिनविरोध; तर उर्वरित जागांवर नामनिर्देशनपत्रे प्राप्त न झाल्यामुळे 20 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्याची आवश्यकता भासली नाही. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे आज प्रत्यक्षात केवळ 127 ग्रामपंचायतींच्या 816 जागांसाठी मतदान झाले. 
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हानिहाय झालेले प्राथमिक अंदाजानुसार सरासरी मतदान (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे (11)- 74, रायगड (1)- 80, रत्नागिरी (1)- 71, नाशिक (30)- 85, जळगाव (1)- 82, नंदुरबार (36)- 70, अहमदनगर (3)- 80, पुणे (7)- 84, सोलापूर (2)- 88, बीड (5)- 75, नांदेड (3)- 89, उस्मानाबाद (4)- 68, लातूर (4)- 74, हिंगोली (1)- 79, अमरावती (1)- 65, यवतमाळ (3)- 78, बुलडाणा (1)- 67, नागपूर (2)- 80, चंद्रपूर (9)- 62 आणि गोंदिया (2)- 89. एकूण सरासरी- 77.