Search This Blog

Wednesday, February 8, 2017

टाटा, गोयंका, महिंद्रा आदींकडून मतदार जागृतीसाठी प्रतिसाद

टाटा, गोयंका, महिंद्रा आदींकडून
मतदार जागृतीसाठी सकारात्मक प्रतिसाद
               -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 8: महानगरपालिका निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मतदार जागृती मोहिमेला प्रोत्साहन देण्‍यासाठी उद्योग जगतातील मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यात श्री. रतन टाटा, श्री. आनंद महिंद्रा, श्री. हर्ष गोयंका आदींचा समावेश आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, ग्रामीण भागाच्या तुलनेत महानगरपालिकांमध्ये मतदानाचे प्रमाण तुलनेने कमी असते. ते वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहिराती, होर्डिंग पथनाट्य, विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेऱ्या, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य, सोशल मीडिया, कम्युनिटी रेडिओ इत्यादींद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यात विविध उद्योग समूहांनीही सक्रिय सहभागी व्हावे यादृष्टीने आयोगातर्फे सर्व संबंधितांना आवाहन करण्यात आले होते.
आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन श्री. रतन टाटा, श्री. आनंद महिंद्रा, श्री. हर्ष गोयंका यांनी वेगवेगळ्या वेळी स्वत: आयोगाच्या कार्यालयात भेट देऊन प्रत्यक्ष चर्चा केली आहे. आपापल्या उद्योगसमूहातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी वेळेची सवलत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. उद्योगसमूहाच्या सर्व ठिकाणी मतदार जागृतीबाबत फलक लावण्यात येतील. त्याचबरोबर इतर काही उपक्रम शक्य असल्यास तेही राबविले जातील, असे या तिघांनी चर्चेच्या वेळी सांगितले आहे. अशा पद्धतीने मतदार जागृती मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त होणे आवश्यक आहे, असे मतही श्री. सहारिया यांनी व्यक्त केले आहे.