Search This Blog

Wednesday, April 26, 2017

हलगर्जी करणाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश

निवडणूक कामात हलगर्जी करणाऱ्यांना
त्वरित निलंबित करण्याचे आदेश
मुंबई, दि. 26: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्पर्तेमुळेच निवडणुका पार पाडणे शक्य होते; परंतु काही अपवादात्मक कर्मचारी व अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करतात. अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. सध्या भिवंडी- निजामूपर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त उपलब्ध करून देतात; परंतु पनवेल व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी रूज झालेले नाहीत, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी उद्या (ता. 27) रूजू न झाल्यास त्यांना त्वरीत निलंबित करावे व त्यांच्याविरूद्ध प्रशासकीय कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक 19 एप्रिल 2017 रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी 24 मे 2017 रोजी मतदान होणार आहे.