Search This Blog

Thursday, November 10, 2016

70 टक्के नामनिर्देशनपत्रे संगणकप्रणालीद्वारे


सुमारे 70 टक्के नामनिर्देशनपत्रे संगणकप्रणालीद्वारे प्राप्त
नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 20716 तर नगराध्यक्षपदासाठी 1533 अर्ज वैध
           मुंबई, दि. 10: राज्यातील पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 165 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 3 हजार 750 जागांसाठी एकूण 24 हजार 191 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली असून त्यापैकी 20 हजार 716 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत; तर थेट नगराध्यक्ष पदाच्या 147 जागांसाठी 2 हजार 374 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. त्यापैकी 1 हजार 533 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. यातील सुमारे 70 टक्के नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे संगणक प्रणालीद्वारे प्राप्त झाली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
          श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यात या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 2016 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी 29 ऑक्टोबर 2016 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत होती. बहिष्कारामुळे शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही.
नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता; परंतु काही ठिकाणी वीज पुरवठा आणि इंटरनेटबाबत अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेऊन कोणीही नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यापासून वंचित राहून नये, यासाठी अखेरचे दोन दिवस पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. आता उर्वरित तीन टप्प्यांसाठी मदत कक्ष, ई-म्युटेशन सुविधा इत्यादी उपाययोजना अधिक प्रभावी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी कोणत्याही अडचणी उद्‌भवणार नाहीत, असा विश्वासही श्री. सहारिया यांनी व्यक्त केला.