Search This Blog

Wednesday, December 24, 2025

निवडणूकविषयक जाहिरातींना बंदी

 प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूकविषयक जाहिरातींना बंदी

मुंबई, दि. 24: महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार असल्याने, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वरे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिली.

राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. श्री. वाघमारे यांनी सांगितले की, महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या 48 तास आधी म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाही. त्यामुळे जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर मुद्रित माध्यमांच्या जाहिरातीच्या पूर्वप्रमाणनाचा किंवा परवानगीचा प्रश्न उद्‌भवत नाही. यासंदर्भातील सविस्तर बाबी राज्य निवडणूक आयोगाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्यानिवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025’मध्ये नमूद केल्या आहेत.

श्री. काकाणी यांनी याप्रसंगी तपशिलवार सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, इच्छूक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे; परंतु सूचक आणि अनुमोदकाचे नाव मात्र उमेदवार निवडणूक लढवत असलेल्याच प्रभागात असणे आवश्यक आहे. पक्षाच्या उमेदवारास आणि अपक्ष उमेदवारासही प्रत्येकी एक सूचक आणि एका अनुमोदकाची आवश्यकता असते. एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागात नामनिर्देशनपत्र भरून शकतात; परंतु एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठी निवडणूक लढविता येते आणि एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतात.

Friday, December 19, 2025

भरारी पथकांची स्थापना करावी

 महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी

मुंबई, दि. 19: महानगरपालिका निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याकरिता आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी. त्याचबरोबर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुसज्ज ठेवावित आणि मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यादृष्टीने आतापासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची आज दूरचित्र संवादाच्या माध्यमातून (व्हीसी) बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. वाघमारे यांनी सांगितले की, भरारी पथकांच्या माध्यमांतून आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी पुरेशा मनुष्यबळाची व्यवस्था करावी; तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलीस यंत्रणेसोबत समन्वय साधावा. त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित प्रभागांचे नकाशे, प्रभागातील जागानिहाय आरक्षण, नामनिर्देशनपत्र व शपथपत्राचे नमुने, इतर आवश्यक अधिकारी/ कर्मचारी, आवश्यक साहित्य इत्यादींची त्वरित व्यवस्था करण्यात यावी. मतदारांना सहज व सुलभरीत्या मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर किमान सेवा- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शक्य असलेल्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे किंवा पिंक मतदान केंद्रांची उभारणी करावी.

 श्री. काकाणी यांनी बैठकीत सादरीकरण केले. महानगरपालिकेसंदर्भातील अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाचे विविध आदेश यासंदर्भात त्यांनी तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की, उमेदवारांच्या यादीतील आणि मतपत्रिकांवरील उमेदवारांच्या नावांचा क्रम राज्य शासनाने महानगरपालिका निवडणूक नियमात केलेल्या सुधारणेनुसार लावावा. निवडणूक चिन्ह वाटपासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या 05 मे 2025 रोजीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता महानगरपालिका आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधावा.