Search This Blog

Sunday, October 16, 2022

1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

 विविध जिल्ह्यांतील 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

मुंबई, दि. 16 (रानिआ): विविध 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांप्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. 

राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 64.83 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी उद्या (ता. 17 ऑक्टोबर) मतमोजणी होईल.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 134, पालघर- 336, रायगड- 16, रत्नागिरी- 36, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 187, नंदुरबार- 200, पुणे- 1, सातारा- 4, कोल्हापूर- 3, अमरावती- 1, वाशीम- 1, नागपूर- 15, वर्धा- 9, चंद्रपूर- 92, भंडारा- 19, गोंदिया- 5 आणि गडचिरोली- 16. एकूण- 1079.

Wednesday, October 5, 2022

7 हजार 649 ग्रा.पं.साठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई, दि. 6 (रानिआ): राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, से राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.